Posts

Showing posts from June, 2024

अभंगाचा गाथा ९

        पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥ जेथें तेथें देखे तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥        देवा, आम्हाला जे हवे आहे ते सर्व मिळाले आहे. आता दुसरी भावना आमच्या मनात येऊ देऊ नकोस.        जेथे पहावे तेथे तुझीच पाऊले दिसतात. विठ्ठला, त्रिभुवनात तूच संचारत आहेस. भेदाभेद आणि संवाद हे सर्व भ्रम आहेत,आम्हाला त्याच्याशी वाद होऊ देऊ नकोस.        तुकाराम महाराज म्हणतात,  सगळ्यात छोटा असा अणू त्यात ही तू आहेस. आणि तसाच तू आभाळाहूनही मोठा आहेस. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,  श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ वीणा कुलकर्णी 🙏🙏

अभंगाचा गाथा ८

      अंतरिचीं घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळे ॥ तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥       देव भक्ताच्या अंतःकरणातील भक्तीची गोडी आणि भाव पाहतो. देव भक्ताचा नातेवाईक झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात. आपल्या जवळ जे वैभव आहे ते निर्मळ मनाने स्वीकारावे.        तुकाराम महाराज म्हणतात,  अशा भक्तांबरोबर देव भोजन करतो व आपल्या प्रेमाचा वर्षाव करतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,   श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ वीणा कुलकर्णी  🙏🙏