अभंगांचा गाथा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रूळे माळ कंठी वैजयंती ॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥ राजस , सुकुमार असे विठ्ठलाचे रूप जणू मदनाचा पुतळा आहे , ज्याच्यापुढे सूर्यचंद्रांचे तेज ही कमी वाटत आहे. विठ्ठलाने कस्तुरीचा मळवट भरला आहे आणि अंगाला चंदनाची उटी लावली आहे तर गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे. मुकुट आणि कुंडलांमुळे चेहरा सुंदर दिसत आहे. त्या कडे बघणे जणू काही सुखाची परिसीमा आहे. कमरेला सोनसळा आहे तर खांद्यावर पाटोळा पांघरला आहे , असा हा घननीळ सावळा दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जीवाला आता धीर निघत नाही, तुम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन , त्या विठूराया च्या दर्शनाचा लाभ घ्यावा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏