Posts

Showing posts from May, 2024

अभंगाचा गाथा ७

        आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥        जो आपल्या हितासाठी जागृत असतो, त्याचे आई वडील धन्य आहेत. ज्या कुळामध्ये सात्त्विक मुले मुली जन्माला येतात त्यांच्याबद्दल देवालाही आनंद होतो. अशी मुले गीता, भागवताचे श्रवण करतात आणि विठोबाचे अखंड चिंतन करतात.       तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर मी खूपच भाग्यवान असेन. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,   श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥  वीणा कुलकर्णी 🙏🙏

अभंगाचा गाथा ६

        झालों सावध झालों । हरीच्या आलों जागरणा ॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥ तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥         आता मी सावध झालो आहे म्हणून हरीच्या जागरणाला आलो आहे. त्या जागराच्या ठिकाणी वैष्णवांची गर्दी झाली असून भजनाचा जयजयकार होत आहे. नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे.         तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी हरीच्या प्रेमाचा ओलावा आहे आणि कृपेची छाया आहे.    बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,   श्री ज्ञानदेव तुकाराम,  पंढरीनाथ महाराज की जय ॥  वीणा कुलकर्णी 🙏

अभंगाचा गाथा ५

    नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥ तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥     देवाने मला मधुर गळा, गोड स्वर दिला नाही. पण मला ठाऊक आहे की देव त्याचा भुकेला नाही. जसा येईल तसा भक्तीभावे रामकृष्ण हा मंत्र जपायचा आहे. देवाची विश्वासाने, प्रेमाने,आवडीने भक्ती करायची आहे.      तुकाराम महाराज म्हणतात,  हे मना तुला मी सांगतो, की विठ्ठला विषयी तू दिवसेंदिवस दृढ निर्धार धर.  बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ वीणा कुलकर्णी 🙏🙏