कृतज्ञता

    काय निसर्गाचा चमत्कार आहे पहा !! 'कालनिर्णय' ने सांगितले वसंतोत्सवाची सुरुवात होतेय, आणि, इकडे समोरचा पुर्णपणे सुकलेला गुलमोहर झाला की हो हिरवा जर्द आणि पुढच्या महिन्यात होईल पिवळाधम्मक !!!

  कमाल आहे की नाही, निसर्ग नेहमीच आपल्याला चमत्कार दाखवत असतो, त्यातील आपण किती पाहतो ही गोष्ट अलाहिदा !!!

  मानवी मना/शरीराचेही तसेच आहे, what's app मेसेजेस मुळे याचे महत्त्व आतापर्यंत सगळ्यांच्याच लक्षात आले असेलच कि किती नियोजन पूर्ण सर्व चालते, जणू काही मशीनच, इ.इ...... असो.

  आपल्याला आयुष्यात अनेक माणसे भेटतात. आवडती,नावडती, नाइलाजास्तव बांधलेली, मनापासून हवीहवीशी आणि अनेक !! काहीजणांना दूर करताच येत नाही, तर काही जाणीवपूर्वक आयुष्यात आलेली आणि काही प्रियजनांहून ही प्रिय अशी.... मित्रमंडळी !!!!

   असे अनेक प्रकार.... पण आपण सहसा या संदर्भातील वाईट वागणूकच लक्षात ठेवतो, चांगल्या गोष्टी विसरूनच जातो.

   कुणाचे आपल्यावर खूप उपकार (जे आपण सहजच विसरून जातो), तर कुणावर आपण केलेले (जे आपण कधीच विसरत नाही), तर काही माणसे अबोलतेने आपल्याला साथ करत असतात, जाणीवूही न देता.....

   मी 1999 मध्ये मोठ्या ऑफिसात बदली होऊन गेले. भलेमोठे फर्निचर यार्ड, अगदी ब्रिगेडियर ते मजदूर यांच्याशी डायरेक्ट संबंध,हजारो फॅमिली क्वार्टर्स, त्या संदर्भात काम…

   मोठाल्या गोडाऊन मध्ये अंगावर येणारे फर्निचर, कितीही लाईट्स लावलेले तरी जाणवणारे अंधाराचे अस्तित्व! या मध्ये बहुतांश पुरूषांच्या दुनियेत मी..... साधारण चाळीस आसपास वय, राहणीमान बर्‍यापैकी चांगले, नजरेत भरण्यासारखे !!!!

   अशावेळेस माझ्या मागे उभे राहिले दोन सिनीयर कारपेंटर !!!!

   भूपती आणि मोहन सिंग..

खरेतर कुणीही काहीच करणार नव्हते. सगळीच चांगली माणसे होती, जनरली असतात तशीच ....तरीही मन चिंती ते वैरी न चिंती.. !!!!

   आपला सहावा सेन्स अकारण(?) सजग ठेवत असतो, अनामिक भिती घालत असतो, कारण तशाच प्रकारच्या बातम्या आपण ऐकत, वाचत असतो.

   ह्या सगळ्या जीवनप्रवासात किती खारीचे वाटेकरी आपल्या भेटतात, बऱ्याचशा वेळेला आपण त्यांना विसरूनही जातो. पण त्यांचा वाटा केवढा मोठ्ठाच असतो ते कृतज्ञतापूर्वक लक्षात ठेवणे खूपच गरजेचे असते.

   मी त्यावेळेस त्या दोघांना सांगून ठेवले होते, मी खूप भित्री आहे, अगदी उंदीर आणि झुरळालाही घाबरते (अर्थात तसे खरे नाही) त्यामुळे मला कधी एकटे सोडू नका.

   बस्स..... झाले !! ते दोघे माझ्या मागे सख्खया मोठ्या भावा प्रमाणे उभे राहिले, कायम माझी सावली बनून.

   मी संध्याकाळी उशिरापर्यंत काम करत राहिले तर आसपास ते हजर असतच. कधी प्रेमाने कागदात बांधून गरम समोसे, चहा घेवून येत. ते प्रेम जास्त महत्त्वाचे होते, स्वच्छता, फिटनेस पेक्षा, त्यामुळेच ते मला जास्त गोड लागत.

   मी सुदैवी मला असे निरपेक्ष प्रेम मिळाले, ते समजले हीच जीवनातील मोठी कमाई आहे.

   त्यामुळेच मी मनाच्या एका कोपऱ्यात त्यांना कायमसाठी कृतज्ञतापूर्वक जागा दिली आहे 🙏

Comments

  1. Vasant Govind PhadkeMarch 14, 2022 at 11:16 AM

    भेटलेल्या भल्या माणसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची मानसिकता खूपच छान .....

    ReplyDelete
  2. छान, नोकरी करणाऱ्या सर्व भगिनींसाठी नक्की मार्गदर्शक ठरावे असे विचार...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! अशा comments हुरूप वाढवतात.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १२

अभंगाचा गाथा १०