समंजसपणा.

1.  अंजलीला रात्रभर झोप लागली नव्हती. तिच्या मुलाचा शाळेचा आज पहिलाच दिवस ! शांत, अबोल असा मुलगा शाळेत कसा काय ॲडजेस्ट होईल, कसे मित्रमंडळ जमवेल या विचाराने ती संचित होती.

     शेवटी त्याला शाळेत सोडून ती घरी आली. शाळा सुटायच्या वेळेपर्यंत तिची घालमेल सुरूच होती. कधी एकदा शाळेत पोचून त्याला बघते, बाईंना सगळे विचारते असे तिला झाले होते.

     शाळेत पोचली तर मुलगा स्मितहास्य करत बाईंजवळ उभा होता.

    बाई म्हणल्या, "तुमचा मुलगा खूपच बोलका,मनमिळाऊ आहे हो आणि बऱ्यापैकी धीट ही, मारामारी करणाऱ्या मुलांना समजावून थांबवले त्याने"

    अंजली चकीत झाली !! तिचा मुलगा समंजसपणे तिच्याकडे हसत बघत होता.

   आता तिला कळले, उगाचच अती काळजीने तिचाच जीव पोखरला होता. मुलगा मात्र नवीन आव्हाने पेलायला उमेदीने तयार होता, समंजसपणे !!!!!


2.   माधवराव पेपर वाचत सोफ्यावर बसले होते पण लक्ष मात्र किचनमधून येणाऱ्या आवाजावर होते.

     मोहित अमेरिकेहून आला होता त्यामुळे घरात खुशीचे वातावरण होते. आई मालतीबाई लाडक्या लेकाला गरमागरम कांदा भजी तळून देत होत्या, त्याचा आस्वाद लेक ओट्यावर बसूनच घेत होता. बाजूलाच लाडकी बहिण दादा दादा करत आईला बारीकसारीक मदत करत होती. तो ही तिची लग्न ठरवूया आता अशी थट्टा करत होता. एकंदर आनंदी, मजेच्या वातावरणात सगळे हसत खिदळत होते.

    आयुष्यभर ऑफिसला वाहून घेतलेल्या माधवरावांनी घराकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. मुलांचे, घरचे, दारचे सगळेच मालतीबाई बघत. माधवरावांना काही सांगण्यास गेल्या तर ते अंग झटकून त्यांच्यावरच डाफरत. त्यामुळे सणवार, पै-पाहुणा, नातेवाईक सगळेच निगुतीने पाहणाऱ्या  मालतीबाई सगळीकडेच आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे लोकप्रिय होत्या. मुले तर त्यांच्यावरच अवलंबून असत, प्रत्येक गोष्टीसाठी !!

    हल्ली हल्ली माधवरावांना आपली चूक लक्षात येवू लागली होती. रिटायर्ड झाल्यामुळे बराचसा वेळ घरातच जात असे. पण त्यांच्याशिवाय घरात कुणाचे काहीच अडत नव्हते. आणि आता त्यांची सवयच नसल्यामुळे त्यांना सामिल करून घेणे कठीण झाले होते.

    त्यांनी एकदोनदा सामिल होण्याचा प्रयत्न करून बघितला पण ना त्यांना जमले ना घरातल्याना !! निष्फळच ठरले ते !!!!

    ही त्यांची अडचण मालतीबाईनी बरोबर ओळखली. एका पैशाचाही हिशोब न विचारणाऱ्या नवऱ्याची आत्ताची गरज त्यांना समजली व त्यांना सामिल करून घेण्याच्या दृष्टीने  हळूहळू पावले उचलली.

    आत्ताही गरम भज्यांची ताटली घेवून त्या मुलांसकट बाहेर आल्या व अवांतर गप्पा मारत माधवरावांना त्यात खेचून घेतले.

     हळूहळू माधवराव ही त्यात सामिल झाले. थोडा वेळ लागला पण संवादाच्या दृष्टिने पावले पडू लागली होते हे नक्कीच !!!!!

    माधवरावही सामिल होऊ लागले हळूहळू....समंजसपणे ....


3. आजोबांना थोडे बरे वाटत नव्हते. शेवटी घरच्यांनी त्यांना हाॅस्पिटल ला भरती करण्याचे ठरवले.

    त्यामुळे सकाळी उठल्यापासून त्यांच्या जीवाची घालमेल सुरू होती. आपण या वेळी नक्की परत येवू का या विचारापेक्षा आजींच्या काळजीने ते जास्त अस्वस्थ होते.

   त्यांची ही अस्वस्थता आजींच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. शेवटी त्या आजोबांना म्हणल्याच, "स्वस्थ चित्ताने भरती होऊन लवकर बरे होऊन घरी या. आपला मुलगा व सून आपली योग्य काळजी घेत आहेत व मी ही स्वतःला नीट जपत आहे. त्यामुळे माझी काळजी करू नका, लवकर बरे व्हा. "

   आजींच्या  त्या समजूतदार बोलण्याने आजोबांना धीर आला की अगदीच काही बरेवाईट झाले तरी आजींच्या मनाची तयारी होईल तर !!!

  आजोबांनी मनाशीच मान हलवली समंजसपणे......

   आणि......आजोबा पूर्ण बरे होऊनच चार दिवसात स्वतःच्या पावलांनी घरी आले !!!!!

   आजी मनापासून मंद हसल्या समाधानाने,समंजसपणे....!!!!!


वीणा कुलकर्णी  🙏

Comments

  1. Vasant Govind PhadkeApril 30, 2022 at 6:09 PM

    अगदी प्रत्येकाच्या जीवनातील प्रसंगांचे, नेमक्या शब्दात वर्णन केलेस, शब्दांनाही फाफटपसारा न लावायचा समंजसपणा शिकवलायस .....
    great !

    ReplyDelete
  2. प्रत्येक प्रसंग आपल्या समोर घडत आहे असेच वाटते, फारच सुंदर लिहिले आहे

    ReplyDelete
  3. एकदम सुंदर,आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा खूप बदल घडवून आणतात.फक्त एकमेकाला समजून घेणे गरजेचे असते.आणि अश्या छोट्या छोट्या गोष्टी वाचण्यात आल्या आणि थोड्या फार प्रमाणात करून बघितलेल्या तरी खूप झाले,आपल्या या वयात खूप गरजेचे आहे.धन्यवाद ,,🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १२

अभंगाचा गाथा १०