अभंगाचा गाथा ११
पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥ वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥
जे संत पुढे गेले आहेत त्यांचा मार्ग शोधत, त्यांच्या मागे जाऊया. त्यांच्या पावलांच्या धुळीला वंदन करून, त्यांचे उष्टे सेवन करू. त्या मुळे आपल्या पूर्व कर्मांची होळी होईल. हे अनुपम असे ज्ञानाचे भांडवल पदरी बांधून घेऊ व विठ्ठलाला शरण जाऊ. गोविंदाच्या केवळ नामस्मरणाने व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील. जन्म मरणाच्या फेऱ्या संपतील व संत सहवासामुळे हा जन्म सार्थकी लागेल.
तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाने गेले असता मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥
वीणा कुलकर्णी 🙏🙏
किती सुंदर लिहीलय आज 👌
ReplyDeleteथोडक्यात, पण छान निरूपण..
ReplyDelete