करोना नंतर.....
मध्ये वाॅटस् ॲपवर एक चांगली पोस्ट वाचनात आली, डॉक्टर प्रकाश कोयाडे लिखित. त्यात असे म्हटले होते की, कोविड नंतर लोक बदलतील, पुन्हा मिळालेल्या संधीमुळे!! पण त्या भयानक परिस्थिती नंतर आता काय दिसून येत आहे ?? घाणेरडे राजकारण, धर्मकारणच !! शंभर वर्षांपूर्वी युरोपात आलेल्या साथीमुळे तिथे बंद नाले, साफसफाई इत्यादी जे जे चांगले सुरु झाले ते आजतागायत !! त्या लेखात पुढे प्रश्न विचारला होता की पुन्हा जर अशी काही आपत्ती आली तर आपली काय तयारी आहे ??????
खूप अंगावर येणारा लेख,तो ही एका डाॅक्टर ने लिहीलेला, त्यामुळे मन जास्त विषण्ण झाले. कारण खरोखरच करोना मुळे खालावलेल्या आर्थिक, सामाजिक व मुख्य म्हणजे मानसिक स्थितीला पुन्हा वर आणण्यासाठी आपल्याकडे काय उपाय योजले जात आहेत हा एक संशोधनाचाच विषय ठरावा !!
भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांत तुलना करण्याइतका माझा अभ्यास नाही पण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला माझ्या सामान्य पातळीवर जे काही चांगले दिसते ते नक्कीच नमूद करावेसे वाटते.
करोना चा पहिला भर ओसरल्यावर ऑस्ट्रेलियात लोकांना जमिन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सरकारने एक स्कीम काढली, आर्थिक गाडा रुळावर येण्यासाठी. जमिनची किंमत अर्धी तुम्ही भरायची, अर्धी सरकार भरणार...
त्यानंतर तेथे घर बांधले जाणार म्हणजे एकूणच आर्थिक व्यवहार होणार, कामगारांना काम मिळणार मग हळूहळू आर्थिक गणित सुरळीत होण्यास मदत होणार !!!
2019-20 च्याच वर्षांत ऑस्ट्रेलियात मोठा वणवा पेटला होता. वातावरण बदलाचा खूपच भयानक फटका प्राणी, पक्ष्यांनाही बसला होता. त्यावर उतारा म्हणून असेल कदाचित इथे छोटे छोटे पण परिणामकारक असे खूप मोठे बदल दिसून येत आहेत.
साधी ब्रेडची पिशवी बंद करतो ते टॅग/क्लीप, ज्यावर तारीख लिहीलेली असते... ते आधी प्लॅस्टिक चे असे ते आता पुठ्ठ्याचे बनवलेले असते. हजारो प्लॅस्टिक तुकड्यांऐवजी हे सहज विघटन होणारे पर्यावरण पूरक, पुठ्ठ्याचे टॅग बनवणे आपल्याकडेही आचरणात आणण्यासारखे !!!
तसेच इथल्या सुपर मार्केट मध्ये फळे व भाज्यांसाठी आधी प्लॅस्टिक टोपल्या असत,त्याही आता पुठ्ठ्याच्या दिसून येत आहेत.
अजून एक बातमी वाचनात आली होती, इंग्लंडने ही करोना काळात लोकांना $500 ची फ्री व्हाउचर्स दिली होती, त्यांनी खरेदी करून बाजाराला आर्थिक चालना द्यावी म्हणून.
आपल्याकडेही अशी अनेक उदाहरणे आहेत ती जगासमोर सकारात्मक पध्दतीने आली पाहिजेत.
त्यामुळे जगात चांगले चाललेले वाचावे, बघावे, आचरणात आणावे म्हणून हा लिखाण खटाटोप !!!!!!
वीणा कुलकर्णी 🙏🙏
Comments
Post a Comment